जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; ९० टक्के मृत्यू पुरुषांचे, व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण

नैराश्य, कौटुंबिक तणाव, कर्जबाजारीपणा यांचाही मोठा वाटा; दिवसाला सरासरी दोन जणांचे जीवन संपुष्टात
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांमुळे ४४३ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांकडे झाली असून, त्यापैकी ३८३ म्हणजे सुमारे ९० टक्के मृत्यू पुरुषांचे आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या घटनांमध्ये दारू किंवा इतर व्यसनांचे व्यसन, नैराश्य, कौटुंबिक तणाव आणि कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यात दररोज सरासरी दोन जण आत्महत्या करत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण
पोलिसांकडील आकडेवारीनुसार आत्महत्यांच्या कारणांमध्ये दारू किंवा अन्य व्यसनामुळे ९०, नैराश्यामुळे ७४, कौटुंबिक कारणांमुळे ६१, कर्जबाजारीपणामुळे ५२, आजाराला कंटाळून ४४, लग्न जुळत नसल्याने २९, प्रेमप्रकरणातून ७, मानसिक आजारामुळे ६ आणि परीक्षेच्या तणावातून ४ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
पुरुषांमध्ये प्रमाण सर्वाधिक
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये प्रौढ पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनाधीनता, मानसिक नैराश्य, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक तणाव या कारणांमुळे अनेक पुरुषांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे महिलांमध्ये कौटुंबिक वाद आणि नैराश्य ही प्रमुख कारणे आढळून आली आहेत.
अल्पवयीनांमधील वाढती चिंता
आत्महत्यांच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मुलांमध्ये नैराश्य, कौटुंबिक वातावरण, शिक्षणाचा ताण, प्रेमप्रकरणे आणि व्यसन ही कारणे समोर आली आहेत. तर मुलींमध्ये कौटुंबिक तणाव, परीक्षेचा ताण आणि प्रेमप्रकरणांमुळे आत्महत्यांच्या घटना घडल्याचे नोंदविण्यात आले आहे.
महिलांच्याही आत्महत्यांची नोंद
महिलांमध्ये कौटुंबिक कारणांमुळे ११, नैराश्यामुळे १०, आजारामुळे ५, मानसिक आजारामुळे २ आणि प्रेमप्रकरणातून १ महिलेने आत्महत्या केल्याची नोंद आहे. मुलींमध्ये कौटुंबिक कारणांमुळे ४, परीक्षेच्या तणावामुळे ४ आणि प्रेमप्रकरणातून ३ आत्महत्यांची नोंद झाली आहे.
पोलिसांचा नागरिकांना सल्ला
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे, व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालकांनी मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या आवडी-निवडीनुसार करिअरची संधी द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अडचणीच्या काळात मदत मागा
मानसिक तणाव, नैराश्य किंवा संकटाच्या परिस्थितीत कोणताही व्यक्ती एकटा नाही. गरज भासल्यास कुटुंबीय, विश्वासू मित्र, आरोग्यतज्ज्ञ किंवा पोलिसांची मदत घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.









