पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेतलेल्या ३५ वर्षीय महिलेचा खोल पाण्यात आढळला मृतदेह
जळगाव (प्रतिनिधी) – बांभोरीजवळील पुलावरून नदीपात्रात उडी घेतलेल्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह जळगाव महापालिका अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर शोधून बाहेर काढला. जयश्री प्रकाश चौधरी (वय ३५, रा. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता जयश्री चौधरी यांनी बांभोरीजवळील पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेतला. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले.
शनिवारी सकाळी सुमारे सात वाजता जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लाइफ गार्ड, लाइफ रिंग आणि फायर हुकच्या सहाय्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास शोधमोहीम सुरू करण्यात आली.
गिरणा नदीपात्रातील पाण्याची खोली तसेच पुलाच्या पिलरजवळील प्रतिकूल परिस्थितीमुळे रेस्क्यू ऑपरेशन आव्हानात्मक ठरले. जवानांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास जवान रवींद्र बोरसे यांना पुलाच्या पिलरजवळ खोल पाण्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी धाडसाने फायर हुकच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, सत्तार तडवी आणि चिराग वाघ यांनी रेस्क्यू कार्यात सहभाग घेतला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव शासकीय महाविद्यालय ल रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करील आहे.









