स्वयंशोध फाउंडेशनच्या वतीने निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या महामार्गापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या काँक्रिटीकरण झालेल्या भर रस्त्यावरच्या बांधकामाच्या आसाऱ्या बाहेर आलेल्या आहेत. त्या टोकदार आसाऱ्यामुळे तसेच मोठे खड्डे असल्यामुळे पायी चालणारे नागरिकांना व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. याकरिता नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी चार चाकी टाटा सुमो या वाहनाचे टायर फाटले. टू व्हीलरचे टायरचे ट्यूब फाटले. एका तरुणाला रात्री चालताना आसारी पायाला लागून जखमी झाला. रात्री चालताना त्या रस्त्यावर मोबाईलचा टॉर्च लावून चालावे लागते. कारण लाईटचा प्रकाश कमी असल्याने आसाऱ्या ह्या दिसत नाहीत. तरी आपण या सर्व नागरिकांना घातक ठरणा-या आसाऱ्यांंचा त्रास कमी होण्यासाठी योग्य ती उपाययोजना तत्काळ करण्यात यावी आणि पुढे कोणालाही दुखापत व कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी नगरपरिषदेने घ्यावी, अशी मागणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
वास्तविक, रस्ता नगर परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने याची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. मात्र नशिराबाद नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. कारण या रस्त्याने नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी लोकप्रतिनिधी ये जा करत असतानाही समस्या सोडवण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. निवेदन देण्यासाठी स्वयंशोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, किशोर पाटील, प्रा. डॉ .विश्वनाथ महाजन ,नरेंद्र धर्माधिकारी ,नीरज चितोडे, सौरभ चौधरी, सागर धोबी, दिनेश सावळे यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.