सुमारे १०० माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सहभाग; यशोगाथा, आठवणी आणि संस्थेशी दृढ ऋणानुबंध
जळगाव (प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित, स्वायत्त दर्जा प्राप्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अलुम्नी असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेला ’अलुम्नी मीट २०२६’ हा ऑनलाइन स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. देश-विदेशातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सुमारे १०० माजी विद्यार्थ्यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सहभाग नोंदवत महाविद्यालयाशी असलेले भावनिक नाते पुन्हा एकदा दृढ केले.

कार्यक्रमाची सुरुवात डीन (माजी विद्यार्थी आणि आंतरराष्ट्रीय संबंध) प्रा. प्रशांत शिंपी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करत संस्था आणि माजी विद्यार्थी यांच्यातील सशक्त नातेसंबंध अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, राष्ट्रीय स्तरावरील यश, उत्कृष्ट प्लेसमेंट उपक्रम आणि भविष्यातील दिशा याविषयी माहिती दिली. तसेच माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, इंटर्नशिप, रोजगाराच्या संधी, उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि प्लेसमेंटसाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. रेश्मा अत्तरदे यांनी केले. त्यांनी विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना संवादासाठी आमंत्रित करत त्यांच्या व्यावसायिक यशाचा प्रवास आणि महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देण्याची संधी उपलब्ध करून दिली.यावेळी ऋषिकेश ठाकूर, रिद्धी कर्णावत, जेमिष लखानी, तुषार जैन, निखिल मंडाले, सागर काळे, राहुल सिंग, रोहित सिंग, हर्षल परदेशी, स्वप्निल ठाकूर, किरण भावसार, दर्शन भट, धीरज, आलोक, नरेंद्र महाजन, उन्मेष पाटील, उबेदुल्ला, रोशनी पाटील, तुषार धांडे, जगदीश अटोळे, रुपेश कुमावत, कपिल पारसे, मयूर कासट, सुरज, अभिजीत पवार, निखिल कोठावदे आणि गणेश राज यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, प्रतिष्ठित संस्था तसेच स्वतःच्या उद्योग-व्यवसायातील यशस्वी प्रवास, करिअरमधील अनुभव, उद्योग क्षेत्रातील संधी आणि आव्हाने याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.महाविद्यालयाने दिलेले दर्जेदार तांत्रिक शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन, मूल्याधिष्ठित संस्कार आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळेच आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्य करता येत असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षण, मित्रपरिवार, सांस्कृतिक उपक्रम आणि कॅम्पसच्या आठवणींना उजाळा देताना अनेक जण भावूक झाले.े प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी समारोपप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानत संस्थेच्या प्रगतीसाठी करिअर मार्गदर्शन, इंटर्नशिप, प्लेसमेंट, उद्योग-शैक्षणिक सहकार्य, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता विकासासाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये नियमित सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेरणादायी यशोगाथा, जुन्या आठवणींना दिलेला उजाळा आणि संस्थेबद्दल व्यक्त झालेला अभिमान यामुळे ’अलुम्नी मीट २०२६’ हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक करून माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.










