मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन; जलतारा कामांना प्रशासकीय मान्यता

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शासनाच्या रोजगाराभिमुख व आजीविका वृद्धिंगत करणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. रोजगारनिर्मिती, जलसंवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी ग्रामस्थांनी या योजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना नवीन जलतारा कामांच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या व कामांना औपचारिक सुरुवात करण्यात आली. तसेच राष्ट्रीय स्तरावरील विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेच्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण उपस्थित ग्रामस्थांना दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, गट विकास अधिकारी (नरेगा) सरला पाटील, कृषी अधिकारी (नरेगा) मनोज धांडे तसेच गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी उपस्थित राहून योजनेविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास भादली बु. येथील सरपंच मनोज चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.









