सहवास मतिमंद निवासी शाळेत फळ आहार व शालेय साहित्य वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
भडगाव (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अखिल भारतीय मराठा महासंघ भडगाव व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने वनकोठे ता. एरंडोल येथील सहवास मतिमंद निवासी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी फळ आहार व शालेय साहित्य वाटपाचा हृदयस्पर्शी उपक्रम उत्साहात पार पडला. विशेष मुलांसोबत आनंदाचे क्षण वाटत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना यामुळे कार्यक्रमाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेत्या महानंदाताई पाटील या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून वनकोठे सरपंच उमेश पाटील उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी. बी. भोसले, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख भरत चव्हाण, भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, उपाध्यक्ष हर्षल चौधरी, समन्वयक समाधान पाटील, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगाव तालुका सचिव तथा मराठा महासंघाचे भडगाव तालुकाध्यक्ष यशकुमार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळ आहार, वह्या, पेन तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. विशेष मुलांशी संवाद साधताना उपस्थितांनी त्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा संदेश दिला. समाजातील प्रत्येक घटकाने अशा विशेष मुलांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, त्याग आणि समाजहिताची भूमिका यांचा उल्लेख करत त्यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच खरी अभिवादनाची भावना असल्याचे सांगितले. केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता समाजातील गरजू, विशेषतः दिव्यांग व विशेष मुलांसाठी कार्य करण्याची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. शाळेतील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. विद्यार्थ्यांसोबत मान्यवरांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही विद्यार्थ्यांनी कला व सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अनेक मान्यवर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन यशकुमार पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमास शाळेतील शिक्षक समाधान सावंत, संदिप सरदार, वितेश खैरनार, हर्षल वरूले, विराज जाधव, गौरव खैरनार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक संवेदनशीलता, माणुसकीची जाणीव आणि विशेष मुलांप्रती आपुलकी यांचे दर्शन घडविणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.











