१३ हजार ५०० शेतकऱ्यांना ५४ मेगावॅट सौरऊर्जेचा लाभ होतोय
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यातील कृषीपंप धारकांना दिवसाच्या कालावधीत अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करुन त्यांची सोय करण्यासाठी राज्य शासनाने सौरऊर्जा निर्मिती व मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेस प्राधान्य दिलेले आहे. सौरऊर्जा निर्मितीत महावितरणच्या जळगाव परिमंडलानेही मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० मध्ये ११ प्रकल्पातून ५४ मेगावॅट सौरऊर्जेचे योगदान दिले आहे. याव्दारे सुमारे १३५०० शेतकऱ्यांना दिवसाच्या कालावधीत वीज पुरवठा करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
३ मे २०२५ रोजी धुळे ग्रामीण विभागात चिंचखेडा येथील दोन मेगावॅटचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत झाल्याने वजिरखेडा व चिंचखेडा वाहिन्यावरील सुमारे १५०० शेतकऱ्यांची सोय झाली आहे. जळगाव परिमंडलात आता कार्यान्वीत झालेल्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची संख्या अकरावर पोहचली आहे. या ११ प्रकल्पातून ५४ मेगावॅट सौरऊर्जा होत असून त्यातून सुमारे १३५०० शेतकऱ्यांची दिवसाच्या कालावधीत विजेची सोय झाली आहे.
या पुर्वी अर्थात, नोव्हेंबर २०२४ पासून मार्च २०२५ अखेर पर्यंत जळगाव जिल्ह्यातील जळगाव विभागातील वावडे (४ मेगावॅट), पाचोरा विभागातील लासगाव (५ मेगावॅट), भुसावळ विभागातील वेल्हाळे (८ मेगावॅट) चाळीसगाव विभागातील सांगवी (४ मेगावॅट), धरणगाव विभागातील कुऱ्हे बुद्रुक (५ मेगावॅट), पाचोरा विभागातील सावखेडा होळ (९ मेगावॅट), जळगाव विभागातील विटनेर (३ मेगावॅट), पाचोरा विभागातील बहादरपूर (६ मेगावॅट), व मुक्ताईनगर विभागातील चांदसर येथे (४ मेगावॅटचा) सौरऊर्जा निर्मीती प्रकल्प मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कार्यान्वीत झालेला आहे. जळगाव परिमंडलात मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्यासह इतर सर्व अभियंत्यांच्या प्रयत्नाने इतर प्रकल्पांचेही काम प्रगतीपथावर आहे.