अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एकलहरे शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वल आनंदसिंग गिरासे (वय ३९, रा. कळंबू, ता. अमळनेर, जि. जळगाव) हे १३ मे २०२६ रोजी सकाळी दहाच्या सुमारास एकलहरे शिवारातील डांबरी रस्त्यावरून दुचाकीने जात होते.
राजेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या शेतासमोरील रस्त्यावर अज्ञात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत उज्वल गिरासे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की उज्वल गिरासे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी संदीप दशरथ राजपूत (वय ५०, व्यवसाय डॉक्टर, रा. दोडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १३४(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मारवड पोलिस करीत आहेत.









