पाय घसरून पडून घडली दुर्घटना
जळगाव (प्रतिनिधी):- जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध गोद्री पर्यटन स्थळावर पावसाळ्यात फिरण्यासाठी आणि धबधब्यात पोहण्यासाठी आलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. धबधब्याच्या उंचावरून पाय घसरून खाली पडल्याने २५ वर्षीय तरुणाचा गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. आकाश सुनील पडघान (वय २५, रा. भादोला, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.


आकाश हा आपल्या महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता आणि तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. बुलढाणा येथून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदरी येथील धबधब्यावर मंगळवारी आकाश हा आपल्या ५ ते ६ मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास धबधब्याच्या परिसरात पोहण्याचा आणि पाऊस-पाण्याचा आनंद घेत असताना, अचानक आकाशचा पाय घसरला आणि तो उंचावरून खोल दरीत कोसळला.
या भीषण अपघातात त्याच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर घाबरलेल्या मित्रांनी अत्यंत धैर्याने त्याला सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत उचलून बाहेर आणले. वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला जवळच्या फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
फत्तेपूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्याचा सल्ला दिला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याला जळगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
आपल्या डोळ्यांदेखत मित्राचा झालेला दुर्दैवी अंत पाहून सोबत आलेल्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचून पंचनाम्याची प्रक्रिया केली. मृत आकाशच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. घरातील एकुलता एक तरुण मुलगा अचानक गमावल्यामुळे पडघान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, भादोला परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.









