लग्नाला अवघे २० दिवस; वैशाली मोरे यांच्या निधनाने परिसर हळहळला
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मोहाडी येथील २० वर्षीय नवविवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली सुनील मोरे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव असून तिचा विवाह अवघ्या २० दिवसांपूर्वीच झाला होता.
मृत वैशाली यांचे माहेर भडगाव तालुक्यातील बाळद येथे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह मोहाडी येथील सुनील बाळू मोरे यांच्यासोबत झाला होता. नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी मंगळवारी त्या भर उन्हात दुचाकीने चोपडा येथे गेल्याचे सांगितले जात आहे. तीव्र उष्णतेत प्रवास केल्यानंतर बुधवारी घरी आल्यानंतर त्यांना अचानक मळमळ, चक्कर आणि अस्वस्थता जाणवू लागली.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉ. कोमल देसले यांनी तपासणी केली असता उष्माघाताची लक्षणे आढळून आली. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैशाली यांची प्राणज्योत मालवली.
लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या वैशाली यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी भर दुपारी प्रवास टाळावा, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.










