जळगाव (प्रतिनिधी):- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाघूर धरण परिसरातील पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्च दाब वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शनिवार, ४ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा एकूण ७ तासांचा कडक वीज शटडाऊन घेण्यात आला आहे. परिणामी, या काळात वाघूर धरणावरून पाण्याचा उपसा पूर्णपणे बंद राहणार असल्याने जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.
वाघूर धरण परिसरातील पंपिंग स्टेशन आणि उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचे कामकाज पावसाळ्यात सुरळीत सुरू राहावे, यासाठी एमआयडीसी उपकेंद्रातून वाघूरपर्यंत गेलेल्या सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या मुख्य वीज वाहिनीची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक होते. महावितरणच्या या शटडाऊनमुळे ४ जुलै रोजी धरणावरून शहराकडे पाणी उपसणे शक्य होणार नाही. त्यामुळे संपूर्ण शहराचे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडू नये म्हणून जळगाव महानगरपालिकेने पाणी वितरणाच्या वेळापत्रकात एक दिवसाचा बदल केला आहे.
मनपाचे असे असेल पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक:
ज्या भागात ४ जुलै रोजी पाणी येणार होते, त्या भागात आता ५ जुलै रोजी पाणीपुरवठा केला जाईल.ज्या भागात ५ जुलै रोजी पाणी दिले जाणार होते, तिथे आता ६ जुलै रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल.

पुढील पाणीपुरवठा नियमित होईपर्यंत जळगावकरांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे आणि मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.









