बुडालेल्या मुलांचा शोध घेताना घडली दुर्घटना
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणात बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट पाण्यात उलटल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दि. २३ रोजी उघड झाली आहे. या दुर्घटनेत बुडून तीन जवांनाचा मृत्यू होऊन त्यांना वीरमरण आले असून यात भडगाव तालुक्यातील पांढरद येथील जवान वैभव वाघ यांचा देखील समावेश असल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजून २ जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव येथे प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड ता. सिन्नर) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ रा. पेमगिरी, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. यामध्ये राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला. पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. बुधवारी दि. २२ मे रोजी प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता. दरम्यान शोध कार्यासाठी आज गुरुवारी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांचीच बोट उलटल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वीरमरण आलेल्या तिघांमध्ये पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, चालक वैभव सुनील वाघ यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार आणि कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांच्यावर उपचार सुरु आहे. बोटीत असणारा स्थानिक राहिवाशी गणेश मधुकर देशमुख याचा शोध सुरु आहे.ते धुळे येथील राज्य राखीव बलचे कर्मचारी होते. भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वैभव वाघ यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. हुतात्मा झालेले जवान वैभव वाघ यांचे बालपण हे पिचर्डे गावी आजोबा यांच्याकडे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत, अतिशय हुशार अभ्यासु होते घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यातून यश मिळवत पुढे त्यांनी पुढील शिक्षण हे भडगाव येथे घेतले. अवघ्या बारा दिवसांचा असतांनाच वडीलाचे छत्र हरपले. त्यांनतर पुढील शिक्षण हे भडगाव येथे झाले. २०१४ मध्ये ते गोरेगाव,मुंबई येथे भरती झाले. त्यानंतर ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलात रुजु झाले होते.