मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६ वरील घोडसगावजवळ विचित्र अपघात घडला आहे. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दूध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
अपघातात, पवन सुदाम चौधरी (वय २५), धनराज बन्सीलाल पाटील (वय ४८), धनराज सुरेश सोनार (वय ३७), उमेश राजेंद्र सोळंके (वय ३५), भालचंद्र गुलाब पाटील (वय ३१) हे मयत झालेले आहे. दरम्यान, अपघातात ४ जण धुळे जिल्ह्यातील तर १ जण जळगावमधील मयत झाला आहे. हा अपघात रात्रीच्यावेळी झाला असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती.
यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू आहे.