अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर व पारोळा तालुक्यातील बोरी आणि पांझरा काठावरील अनेक गावे टंचाईग्रस्त असताना कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे या गावांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये यासाठी बोरी नदीवरील तांमसवाडी आणि पाझरावरील अक्कलपाडा धरणातून तातडीने आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आ.अनिल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात आ.अनिल पाटील यांनी आधीही अवर्तनाची मागणी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती मात्र राज्यातील लॉक डाऊन 14 एप्रिल रोजी संपेल याबाबत काही चिन्ह दिसत नसल्याने पाण्याविना ग्रामिण जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी आ.अनिल पाटील यांनी काल तातडीने जळगाव आणि धुळे गाठत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,तसेच जळगाव आणि धुळे जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की अमळनेर व पारोळा तालुक्यातील बोरी काठावरील असंख्य गावांमध्ये पाणीटंचाई असून एप्रिलमध्ये तापमान वाढीची शक्यता असल्याने काही गावामध्ये टंचाईच्या झळा वाढू शकणार आहेत दुसरीकडे कोरोनामुळे देश आणि राज्यात लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे जनतेला बाहेर फिरण्यास मनाई आहे,अश्यावेळी टंचाई उदभवल्यास गावात टँकर सुरू करावे लागतील व त्यावेळी संचारबंदी आणि सोशल डिस्टनसिंग चा भंग होऊ शकेल.यामुळे ही स्थिती पाहता संभाव्य उपाययोजना म्हणून बोरी तामसवाडी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश निर्गमित करावेत अशी मागणी आमदारांनी केली आहे.अशीच परिस्थिती पांझरा काठावरील अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये असल्याने कोरोनाच्या संचारबंदीत जनतेने पाण्याविना हाल होऊ नये यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याचे आदेश निर्गमित व्हावेत अशी मागणी धुळे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आमदारांनी केली आहे.सदर मागणीस पालकमत्र्यांसह दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आ.अनिल पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
आ.अनिल पाटील यांनी जळगाव यांची भेट घेताना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच लॉक डाऊन मुळे जळगाव जिल्ह्यातील 10 हजार मॅट्रीक टन केळी आज पडून असल्याने यावर काही मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आ.अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांनी फोनवर चर्चा करून जिल्ह्यातील केळी उत्पादकांची कैफीयत मांडली.