भोपालमध्ये जेवणानंतर २५ ते ३० विद्यार्थ्यांना उलटी-मळमळीचा त्रास; पाच विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडली
भुसावळ ( प्रतिनिधी ) – हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गटातील काही विद्यार्थ्यांची भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली.जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथक तैनात केले. विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार तसेच आवश्यक औषधे देण्यात आली.

दरम्यान, मंगला एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचताच भुसावळ विभागाकडून विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर, नर्स, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ॲम्बुलन्सही सज्ज ठेवण्यात आली होती.
गाडी भुसावळ स्थानकावर सुमारे पाऊण तास थांबवून सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शैक्षणिक सहलीत एकूण ९३ विद्यार्थी आणि १२ शिक्षक सहभागी आहेत. त्यापैकी सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांना उलटी-मळमळचा त्रास झाला असून, त्यातील पाच विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याची माहिती मिळाली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून काही डॉक्टरांना विद्यार्थ्यांसोबत पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या जेवणामुळे विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय तपासणीनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.








