चाकूहल्ला, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या; गावात तणावाचे वातावरण


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दिवसभरात झालेल्या किरकोळ वादातून हा संघर्ष उफाळून आला. रात्री सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन्ही गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
पहिल्या फिर्यादीनुसार, एका गटाने घरासमोर जमाव जमवून महिलांना जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर सुलभा पवार यांना मारहाण करून खाली पाडण्यात आले, तर शालूबाई पवार यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. फिर्यादी महिलाही बचाव करत असताना त्यांच्या हातावर चाकूचा वार झाल्याने त्या जखमी झाल्या. मदतीला धावून आलेल्या प्रतीक पवार यांनाही काही जणांनी पकडून ठेवत लोखंडी फाईटर व काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच नामनिर्देशित आरोपींसह २० ते ३० अनोळखी व्यक्तींविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, दुसऱ्या गटातील अल्पवयीन दर्शन गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळाच आरोप करण्यात आला आहे. सकाळी झालेल्या वादाबाबत चर्चा करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या वडिलांना लाकडाने मारहाण करण्यात आली, तर दर्शन यांच्या डोक्यात वीट व लोखंडी सळईने प्रहार करून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. हस्तक्षेप करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
अमळनेर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे.
खवशी गावातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.









