अनधिकृत विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जून महिन्यात सुरु होणाऱ्या खरीप हंगामकरीता शेतकऱ्यांना कापसाचे बीटी बियाणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये, यासाठी जिल्ह्यात १६ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती कृषी अधीक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी यांच्याकडून देण्यात आली आहे. या पथकांमार्फत बोगस बियाणे, खते व कीटकनाशक विक्रीला आळा घालण्यात येणार आहे.
कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ चे नियोजन केले आहे. रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय एक व तालुकास्तरीय १५, असे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना केली आहे. यामुळे शेतकरी बांधवांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते. या कालावधीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे.
बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकिटाचा टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पाहावा, तसेच बियाणे पाकिटे पीक निघेपर्यंत जपून ठेवावे. अनधिकृत/विनाबिलाने बियाणे खरेदी करू नये. कीटकनाशक, तणनाशके आदी खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत खरेदी करताना रितसर बिल घ्यावे. कुणी खत विक्रेता जास्त दराने युरियासारख्या अनुदानित खतांची विक्री करीत असेल, तर त्याबाबत लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी कार्यालयास करावी, तसेच एचटीबीटी कापूस वाणाचे अवैध व विनाबिलाने खरेदी करू नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ किंवा भ्रमणध्वनी ९८३४६८४६२० या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.