खासदार स्मिताताई वाघ यांना मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांचे निवेदन; कृषी, संशोधन व ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्याचा प्रस्ताव
जळगाव (प्रतिनिधी) : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांच्या कृषी, संशोधन, शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जळगाव येथे स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांनी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदनाद्वारे केली आहे.

कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर
निवेदनात उत्तर महाराष्ट्र हा राज्यातील कृषी उत्पादनात अग्रेसर विभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केळी, कापूस, द्राक्षे, डाळिंब, कांदा, मका, ऊस, भाजीपाला, दुग्धव्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगामुळे या विभागाचे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. विशेषतः जळगावची ‘केळीची राजधानी’ म्हणून असलेली ओळख लक्षात घेता येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी
उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी राज्यातील इतर भागात जावे लागते. त्यामुळे आर्थिक भार वाढतो आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी मर्यादित राहतात. जळगाव येथे कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यास आधुनिक शिक्षण, संशोधन, प्रयोगशाळा आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अत्याधुनिक संशोधन केंद्रांची मागणी
प्रस्तावित विद्यापीठात राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, कापूस संशोधन केंद्र, कृषी ड्रोन व स्मार्ट फार्मिंग केंद्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कृषी संशोधन केंद्र, हवामान बदल व जलव्यवस्थापन संशोधन केंद्र तसेच अन्न प्रक्रिया व मूल्यवर्धन संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
‘कृषी ज्ञाननगरी’ उभारण्याची संकल्पना
विद्यापीठ परिसरात जागतिक दर्जाची ‘उत्तर महाराष्ट्र कृषी ज्ञाननगरी (Agri Knowledge City)’ उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. यामध्ये कृषी विज्ञान पार्क, डिजिटल संशोधन केंद्र, कृषी स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र, कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
रोजगारनिर्मितीला चालना
या प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार थेट आणि २० हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. कृषी प्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स, संशोधन, निर्यात आणि ग्रामीण उद्योगांना मोठी चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाकडे प्रमुख मागण्या
निवेदनात जळगाव येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना, किमान एक हजार एकर जागा उपलब्ध करून देणे, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ची मान्यता मिळविणे, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, AI व कृषी ड्रोन संशोधन केंद्र सुरू करणे, उत्तर महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांचे संलग्नीकरण तसेच या प्रकल्पासाठी उच्चस्तरीय शासन समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
«”उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी जळगाव येथे स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन होणे ही काळाची गरज आहे,” असे मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.»









