चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज असून छोटे मोठे ५० हुन अधिक तांडे आहेत. अनेक वर्षांपासून तांड्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या तांडा वस्तीवरील प्रश्नांच्या विषयांच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आमदार मंगेश चव्हाण यांनी बंजारा समाजातील शिष्टमंडळासह मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी तळेगावचे सरपंच संतोष राठोड, चिंचगव्हाणचे सरपंच सुभाष राठोड, लोंजेचे माजी उपसरपंच बळीराम चव्हाण, चैतन्य तांडाचे सरपंच पती व भाजपा विजाभज आघाडी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड आदी उपस्थित होते.
या भेटीत चिंचगव्हाणमधून सुंदरनगर, लोंजेमधून आंबेहोळ, तळेगावमधून कृष्णानगर तांड्यांचे विभाजन करून नवीन ग्रामपंचायत निर्माण करणे व राष्ट्रीय महामार्ग २११ ते चैतन्य तांडा पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या पत्राच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही करणे, चाळीसगाव तालुक्यातील नवीन ग्रामपंचायतीना ग्रामसेवक पद (सजा) निर्माण करून पदभरती करणे, स्व.बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालयांना इमारत मंजूर होणे आदी संदर्भात मागणी व चर्चा आमदार चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने केली.