
वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
शिरसोली, ( प्रतिनिधी ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे यांनी भूषविले. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव येथील वनरक्षक ईश्वर मोरे व अभिमान मोरे हे प्रमुख उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील भदाणे, हरित सेना प्रमुख चंद्रकांत कुमावत, ज्येष्ठ शिक्षक अशोक बावस्कर, क्रीडाशिक्षक संजय काटोले तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण आणि जैवविविधतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे समाधान मान्यवरांनी व्यक्त केले.









