अयोध्या (वृत्तसंस्था) – अयोध्येत येणे ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे असे अयोध्या दौऱ्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी अयोध्येत आलो होतो आणि रामललाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री बनल्यानंतर पुन्हा अयोध्येत आलो. अयोध्येत येण्याची ही माझी पहिली वेळ नाही. यापुढे सुद्धा मी या ठिकाणी येत राहीन असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या पत्रकारपरिषदेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेतले.
राम मंदिर निर्मितीसाठी आपल्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपये देणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना केली. राम मंदिराच्या निर्मितीसाठी ट्रस्टची निर्मिती झाली. जेव्हा-जेव्हा अयोध्येला येतो, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण येते. सोबतच, महाराष्ट्रातून अनेक भक्त रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला येतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जमीन देत असतील तर महाराष्ट्र भवनाची निर्मिती या ठिकाणी केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, आपण भाजप या पक्षापासून दूर गेलो, हिंदुत्वापासून नाही. तसेच हिंदुत्व म्हणजे भाजप नाही. हे दोन वेग-वेगळे विषय आहेत असेही ठाकरेंनी ठणकावले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह शनिवारी अयोध्येत पोहोचले. या ठिकाणी राम जन्मभूमी आणि हनुमानगडीचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम होता. 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी अयोध्या दौरा केला होता. यावेळी उद्धव यांच्या दौऱ्यात शरयू आरती आणि सभा रद्द करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याबद्दल आधीच गृहमंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विशेष विमानाने आपल्या कुटुंबियांसोबत लखनौ येथे चौधरी चरण सिंह विमानतळावर पोहोचले होते. यानंतर वाहनाने ते शनिवारी अयोध्येला पोहोचले. अयोध्येत ठाकरेंचा दौरा केवळ 2 तासांचा असला तरीही त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली. अयोध्येत पोहोचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासाठी शिवसैनिक, नेते आणि मंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री सुद्धा अयोध्येत आधीच पोहोचले होते. दर्शनाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे लखनौला जातील आणि त्यानंतर मुंबईला रवाना होतील.