जळगाव जिल्हा पोलीस दल व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा पोलीस दल व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.


डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात आयोजीत या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक नंदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास बावचोळे,संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड डॉ. तसेच सर्व तालुका पो.निरिक्षक,उपनिरीक्षक इ उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मार्गदर्शन करतांना डॉ. सतीश पी.आणि डॉ. मोहीत पाटील यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथमोपचार देण्याचे महत्त्व, रुग्णाचा श्वास सुरू ठेवण्यासाठी योग्य ती मदत, गर्दीऐवजी योग्य मदत कशी करावी तसेच रुग्णवाहिका येईपर्यंत करावयाच्या प्राथमिक उपाययोजनांबाबत माहिती दिली पोस्टरव्दारे मार्गदर्शन करतांना जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे हाताळणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला. अपर पो अधिक्षक नंदीप गावीत यांनी अपघातानंतरचा पहिला एक तास गोल्डन अवर मानला जातो. या काळात त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. महाराष्ट्रात आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा १०८ क्रमांकावर उपलब्ध असून ती २४ु७ मोफत सेवा देते. तसेच वाहतूक व आपत्कालीन मदतीसाठी १०३३ आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी १०८ या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन केले.पुढे बोलतांना शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात असून मृत्यूजंय दूताची नियुक्ती,अपघात ग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना कायदयाचे संरक्षण, ब्लॅक स्पॉट निरीक्षण तसेच सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती दिली.स पो नि विशाल पाटील यांनी पीएम राहत योजनेची माहिती देतांना रूग्णांना वेळेवर मदत करणारे साध्या गणवेषातील मृत्यूजंय दूत हे साध्या गणवेषातील पोलीस असून त्यांच्या मदतीने आपण अपघागतग्रस्तांना तातडीची मदत उपलब्ध करून देत आहोत तसेच पीएम राहत योजनेत अपघातग्रस्तांना कशी मदत मिळवून देता येईल याबाबत माहिती दिली. रूग्णालयाकडून कश्या प्रकारचे सहकार्य अपेक्षीत असून त्याबाबत प्रमुखांनी सूचना दयाव्या व मृत्यूजय दूतांनी कार्य करावे असे आवाहन केले. डॉ. वैभव पाटील यांनी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहेमी सज्ज असतो. याचबरोबर अपघातग्रस्त रूग्णांसाठी मोफत रूग्णवाहीका सेवा सूरू केली असल्याची घोषणा करून रूग्णांना वेळेवर मदत मिळावी यासाठी उपाययोजना करावी असे विनंती केली . डॉ.संस्कृती भिरूड,डॉ.ॠचा गौर, डॉ. मोहीत पाटील यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. यावेळी उपस्थीतांना फस्टएड बॉक्सचे वितरण देखिल करण्यात आले. याचबरोबर शंकाचे निरसन व प्रात्याक्षिक देखिल देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








