पैसा, धन आले आणि ध्यैर्य संपले. आजच्या पिढीमध्ये दोन मिनीटे देखील धीराने राहू शकत नाही ही शोकांतिका आहे. आजच्या पिढीमधील पेशन्स संपलेले आहे. ध्यैर्य नसल्याने ते मात्र डॉक्टरचे पेशंट बनलेले दिसत आहेत. पुढच्या पिढीसाठी बँक बॅलन्स नसेल तरी चालेल परंतु ध्यैर्याचा बॅलन्स अवश्य द्यावा. ध्यैर्याने स्वतः व दुसऱ्यालाही आनंदी ठेवता येते असे विचार परमपुज्य सुमितजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले.
यशस्वी जीवनाच्या तीन महत्त्वाच्या सुत्रावर ध्यैर्य या विषयावर सुरू असलेल्या चर्चेत श्री उत्तराध्ययन सूत्र गाथेचा संदर्भ घेतला. ध्यैर्यवान धीर असलेल्या पुरुषांना दिव्य गती प्राप्त झाली आहे. सर्वोच्च पर्वताचा शेंडा गाठायचा असेल तर विश्वार आणि ध्यैर्य या दोन्ही गोष्टींचे होणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या लहानपणी तहानलेला कावळा ही गोष्ट प्रत्येकाने ऐकलेली असेल. त्याला तहान लागलेली असते परंतु मटक्याच्या तळाशी असलेले पाणी एक एक दगड चोचीत आणून मोठ्या प्रयत्नांनी पाणी वर येते अन तो तहान भागवतो. खासगी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या कावळ्यापासून प्रयत्नवाद, ध्यैर्य शिकणे क्रमप्राप्त आहे. परंतु कावळ्याची ती गोष्ट आपण बालपणीच सोडून देतो. पुढच्या पिढीला ध्यैर्याचा वारसा द्यावा म्हणजे जीवनात आनंदाची पखरण होत राहील असा संदेश प्रवचनात दिला गेला.
कर्म, कर्मबंध यामुळे कसे भोग भोगावे लागतात… या विषयाबाबत परमपूज्य भुतीप्रज्ञजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात सोदाहरण सांगितले. माणूस मोठा बंगला बांधतो परंतु त्यावेळी असंख्य जीवांची हिंसा होते.कर्मफळाबाबत चंद्रवदन चक्रवर्तींची कथा सांगण्यात आली. पाप कार्याची प्रशंसा मुळीच करून नका, दुसऱ्याला दुःख देणार तर तुमच्या पदरी देखील दुःख येणार त्यामुळे कर्म करत असताना सावधान असावे असे आवाहन करण्यात आले.