चाकूचा धाक दाखवत चौघांकडून ७ हजार ८०० रुपयांची लूट; चार आरोपी जेरबंद
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ते पाळधी मार्गावरील हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिकाच्या परिसरात रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवत चार जणांकडून रोख रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. गणपती मंदिरामागे, खोटेनगर, जळगाव) व त्यांचे सहकारी हे जळगाव ते पाळधी मार्गावर असताना आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडविली.


आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच मोटारसायकलीचीही तोडफोड केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. लुटलेली रक्कम- चेतन प्रकाश पाटील यांच्याकडून – ₹४,८००, किशोर लक्ष्मण कोळी यांच्याकडून – ₹१,७००, भूषण पंडित महाजन यांच्याकडून – ₹८००, नरेश अशोक अमृतकर यांच्याकडून – ₹५०० = एकूण लुटलेली रक्कम : ₹७,८००
या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे :- चेतन उर्फ बटाटा रमेश सुसरे (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर, जळगाव) ,रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव), उमाकांत दत्तात्रय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव) आरोपींना ११ जून रोजी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), १२६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३२४(४), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे पुढील तपास करीत आहेत. रात्रीच्या वेळी हॉटेल परिसरात प्रवाशांना लक्ष्य करून जबरी चोरी करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.









