रावेर तालुक्यातील निरूळ येथील घटना
यावल (जळगाव) : महावितरणकडून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी वीज चोरी करताना सापडलेल्या ५ जणांना महावितरणने दंड आकारला होता. मात्र दोन वर्षानंतर देखील दंडाची रक्कम न भरल्याने या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर राज्य वीज वितरण कक्षांतर्गत निरूळ या गावात जुलै २०२२ मध्ये वीजचोरीविरुद्ध महावितरणने धडक मोहीम राबविली होती. खानापूर येथील राज्य वीज वितरण कक्षाचे सहाय्यक अभियंता गणेश सुधाकर दहिभाते यांच्या नेतृत्वाखाली जुलै २०२२ ला वीजचोरीविरुद्ध निरूळ या गावात धडक मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत त्यांना माणिक हिरामण पाटील, शिवाजी राधाकिसन पाटील, रामकृष्ण हिरामण पाटील, सुरेश गुलाबसिंग पाटील व संदीप योगराज पाटील हे पाच जण वीजचोरी करताना आढळून आले. या पाच जणांनी वर्षभरात दोन हजार ६७० युनिटची वीजचोरी केली होती. तेव्हा या सर्वांना ४३ हजार १२३ रुपयाचा दंड आकारून दंड भरण्यासाठीची नोटीस देण्यात आली. मात्र, या सर्वांनी दोन वर्षांत दंड अदा केला नाही.
त्यामुळे यावल पोलिस ठाण्यात सोमवार दिनांक १५ रोजी ५ जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पुढील तपासासाठी हा गुन्हा रावेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार तपास सुरु करण्यात आला आहे.