जळगावातील आसोदा-भादली मार्गावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील आसोदा-भादली रेल्वेमार्गावर एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आली आहे. ते ८ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या अंगातील जावयाने दिलेल्या स्वेटरवरून त्यांची ओळख पटली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजू मानसिंग पाटील (वय ४०, कोळवद ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. ते कोळवद येथे पत्नी, मुलगा, वडील यांच्यासह राहत होते. त्यांच्या मुलीचा विवाह झालेला आहे. तर मुलगा इयत्ता अकरावीत शिकतो. दरम्यान गेल्या १५ दिवसांपासून ते विमनस्क अवस्थेत फिरत होते. त्यांची मनःस्थिती चांगली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, गेल्या ८ दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते. त्यामुळे चिंतीत कुटुंबीयांनी त्यांचे फोटो व माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. काही दिवसात ते परत येतील म्हणून पोलीस स्टेशनला नोंद केली नव्हती.
दरम्यान, सोमवारी राजू पाटील यांचे जावई राहुल पाटील यांना ते असोदा-भादली रेल्वेरुळावर काम करीत असल्याची माहिती एकाने दिली. त्यानुसार ते त्यांना घेण्यासाठी सोमवारी गेले असता, तेथे त्यांना त्याचवेळी अचानक, कोणीतरी रेल्वे रुळाखाली आले आहे, अशा आरोळ्या आल्याने त्यांनी धाव घेतली. तेथे एकाने त्यांना मयत व्यक्तीच्या अंगात “राहुल” नाव लिहिलेले स्वेटर आहे अशी माहिती दिली. हे स्वेटर त्यांचा जावई राहुल यांचेच होते. त्यांनी सासरे मयत राजू पाटील यांना वापरायला दिलेले होते. त्यावरून राहुल पाटील यांनी मयत व्यक्ती हि त्यांचा सासरा असल्याची ओळख पटविली.
दरम्यान, शनिपेठ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मयत राजू पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी हळहळ व्यक्त होत असून शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.