जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतीच्या वादात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . त्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
आबा भगवान महाजन हे पत्नी व दोन मुलांसह एरंडोल शहरातील मारोती मढी येथे वास्तव्याला आहे. त्यांना , सुरेश, तुकाराम आणि मगन हे तीन भाऊ आहे. त्यांच्या आईच्या हिश्श्याचे शेत जो करेल तो आईला वर्षांला १५ हजार रूपये देईल या भावांनी ठरवले होते. याच शेताच्या वादातून आबा महाजन यांचा आपले भाऊ सुरेश, तुकाराम आणि मगन यांच्याशी १२ मेरोजी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आबा महाजन यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचा मुलगा उमेश मध्ये पडल्याचा राग आल्याने सुरेश , तुकाराम , मगन , तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषा व इतरांनी आबा महाजन आणि उमेश महाजन यांना बेदम मारहाण केली.
उमेशला गुप्तांगावर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला आधी एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी जळगाव येथे जाण्याचा सल्ला दिला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले.
शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला असून गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयताचा भाऊ निलेश याने घेतली आहे. मयताच्या पश्चात आई सुनिता, वडील आबा महाजन, भाऊ निलेश, पत्नी मयूरी, बहिण रूपाली असा परीवार आहे.