कारमधून १२.५० लाखांची रोकड लंपास; तेलगळतीचा बहाणा करून चोरट्यांचा डाव यशस्वी


जळगावात व्यापाऱ्याची फसवणूक; चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील गणपती नगर परिसरात एका फळ घाऊक व्यापाऱ्याची १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चलाखीने लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. तेलगळती होत असल्याचा बहाणा करून व्यापाऱ्याला कारमधून खाली उतरविण्यात आले आणि संधी साधून कारच्या मागील सीटवर ठेवलेली रोकड असलेली बॅग चोरट्यांनी पळविली. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ओमप्रकाश मंधान (वय ४४, रा. गणपती नगर, जळगाव) हे कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी येथील “अमर फ्रूट” या घाऊक फळ व्यवसायाचे संचालक आहेत. ३ ऑगस्ट रोजी सकाळी विविध व्यापाऱ्यांकडून त्यांना एकूण १३ लाख रुपयांची रोकड मिळाली होती. त्यापैकी ५० हजार रुपये वेगळे काढून उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये त्यांनी काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवले.
सायंकाळी दुकान बंद करून ते त्यांच्या KIA Sonet (एमएच ४६ बीव्ही ३२९५) या कारने घरी निघाले. रात्री सुमारे ८.०५ वाजता घराजवळ कार पार्क करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारमधून ऑईल गळत असून धूर निघत असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून ते कारमधून खाली उतरले.
याच संधीचा फायदा घेत पांढरा शर्ट व काळी जिन्स परिधान केलेल्या एका अज्ञात इसमाने कारचा मागील दरवाजा उघडून रोकड असलेली बॅग उचलली आणि धूम ठोकली. व्यापाऱ्याने आरडाओरड करत पाठलाग केला असता आरोपी एका मोटारसायकलवर साथीदारासोबत बसून इच्छादेवी चौकाच्या दिशेने पसार झाला. त्यांच्या मागे काळ्या रंगाच्या पल्सरवर आणखी दोन साथीदार पळून गेल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
चोरट्यांनी ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांमध्ये ठेवलेली १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.









