जळगाव ( प्रतिनिधी) – शिरसोली ते पाचोरा रस्त्यावर शिरसोलीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मिठाराम आनंदा पाटील यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका अज्ञात ६० ते ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकार आत्महत्या आहे की खून, या दिशेने एमआयडीसी पोलिसांकडून सखोल तपास सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतमालक मिठाराम पाटील नेहमीप्रमाणे शेतात आले असता, रोडलगत असलेल्या विहिरीमध्ये त्यांना एक वृद्ध महिला मृत अवस्थेत दिसून आली. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना दिली. पोलीस पाटलांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले.
घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी शिरसोली गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, मृत महिलेची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांकडून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदन साठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आला आहे.

दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात, याचे उत्तर पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या अज्ञात वृद्ध महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.








