धान्य वितरणातील कथित अनियमिततेची चौकशी करून परवाना रद्द करण्याची मागणी

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली ३० जून रोजी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रास्तभाव दुकानाला ५३१ शिधापत्रिकाधारकांतील सुमारे २,१०० लाभार्थ्यांसाठी धान्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार आहे. तसेच लाभार्थ्यांचे आगाऊ बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) घेऊन धान्य वितरणात गैरव्यवहार झाल्याचाही आरोप करण्यात आला.


मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदारांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदारांनी प्रत्यक्ष येऊन भूमिका स्पष्ट करावी, या मागणीवर काँग्रेस पदाधिकारी ठाम राहिले. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अखेर तहसीलदार विजय बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, ब्लॉक अध्यक्ष इरफान मणियार, एससी सेलचे तालुकाध्यक्ष श्रावण गायकवाड, माजी शहराध्यक्ष शरिफ वेंडर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धान्यापासून वंचित असल्याचा दावा करणारे अनेक शिधापत्रिकाधारक उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.









