राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री दुर्घटना; चालकाने उडी मारून वाचवले प्राण
मुक्ताईनगर प्रतिनिधी ) – मुक्ताईनगरहून मलकापूरकडे पशुखाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ मे रोजी मध्यरात्री पिंप्री अकराऊत गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

टाटा कंपनीचा १६ चाकी ट्रक (जीजे २५ डब्ल्यू ४२२६) पशुखाद्य घेऊन मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जात होता. दरम्यान, पिंप्री अकराऊत गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटला. अपघातानंतर काही क्षणांतच ट्रकने पेट घेतला आणि आगीने विक्राळ रूप धारण केले.
अपघात होताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले. मात्र, ट्रकमधील दुसऱ्या व्यक्तीस बाहेर पडता न आल्याने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत गुजरात राज्यातील पोरबंदर जिल्ह्यातील मोहम्मदपुरा येथील दिनेश (पूर्ण नाव समजू शकले नाही, वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे.
तर जखमी चालक जाबाराभाई ठेंबाभाई गोरसेरा (वय ३३, रा. पोरबंदर, गुजरात) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, ट्रकसह त्यामधील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव पुढील तपास करीत आहेत.








