महापौरांचे प्रशासनाला आवाहन
जळगाव (प्रतिनिधी):- सध्या जागतिक पातळीवर अमेरिका-इराण युद्धामुळे देशात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर, इंधनाचा काटकसरीने वापर करण्यासाठी आणि शहरातील पर्यावरण रक्षणासाठी जळगाव शहर महानगरपालिकेत आता प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी ‘नो-व्हेहीकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जळगाव शहराच्या महापौर दिपमाला मनोज काळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे तातडीने आदेश दिले आहेत.

पंतप्रधानांनी इंधनाअभावी शासकीय वाहनांचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यानुसार अनेक मान्यवरांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहने कमी करून इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
असे असेल ‘नो-व्हेईकल डे’चे नियोजन
महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दर बुधवारी कार्यालयात येण्या-जाण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करण्याचे आदेशात म्हटले आहे.
सायकल किंवा ई-वाहनांचा वापर: अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायकल किंवा इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करावा.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था: बस सेवा किंवा ऑटो रिक्षा यांसारख्या सार्वजनिक परिवहन सेवेला प्राधान्य द्यावे.
‘व्हेईकल शेअरिंग’ (वाहन भागीदारी): वरील पर्याय शक्य नसल्यास, एकाच मार्गावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार किंवा बाईक शेअर करून एकत्रितपणे कार्यालयात यावे आणि जावे.
जळगाव मनपाने यापूर्वीही अशा प्रकारचे पर्यावरणपूरक धोरण राबवले होते. आताची इंधन टंचाई आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज पाहता, या मोहिमेची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.









