जळगाव (प्रतिनिधी) :- उमाळा-नशिराबाद परिसरातील विविध प्रकारच्या सुमारे २५ कंपन्यांना वारंवार होणाऱ्या वीज ट्रिपिंगचा मोठा फटका बसत असून, दर तासाला वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक संतप्त झाले आहेत. महावितरणकडून कोणतेही ठोस सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत उद्योजकांनी कंपन्या बंद ठेवून चिंचोली सबस्टेशन येथे तीव्र आंदोलन करत निषेध व्यक्त केला.


उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, रोज होणाऱ्या ट्रिपिंगमुळे मशीनरी आणि उत्पादन प्रक्रियेत बिघाड होत आहे. कठीण परिस्थितीत कंपन्या चालवाव्या लागत असून सुमारे ६०० कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मशीनची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वेस्टेज निर्माण होत आहे. त्यामुळे उत्पादन घटत असून आर्थिक नुकसान वाढत आहे. कामगारांचे पगार, बँकांचे कर्ज आणि इतर खर्च कसे भागवायचे, असा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर उभा राहिला आहे.
यामुळे अशा परिस्थितीत वीज कनेक्शन कट करून कंपन्या बंद ठेवणेच सोयीचे असल्याचे सांगत, आतापर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी उद्योजक मुकेश दहाड, हरीश जोशी, मनोज मित्तल, निकूज बियाणी, महेश पाटील, प्रकाश पाटील, आदी उद्योजक यांच्यासह सुमारे मोठ्या संख्येत कर्मचारी उपस्थित होते.
जळगाव तालुक्यातील उमाळा नशिराबाद रोड जवळील विविध कंपन्या मागील आठ वर्षापासून दररोज वीज पुरवठा ट्रिपिंग होत असल्याने उद्योजकांना कोट्यावधींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे ते खालील प्रमाणे
1. एम आय डी सी च्या तुलनेत त प्रति युनिट उत्पादनात 3 रुपयाने महाग पडत आहे
2. वीज पुरवठा मिनिट टू मिनिट ट्रिप झाल्या की कंपनीचे नुकसान होत असल्याने कामगारांच्या पगाराची विवंचना कामगारांचे पगार कसे करावे. व पगार जास्त लागत आहे आणि उत्पादन कमी होत आहे.
3. वीज पुरवठा खंडित झाल्याने प्रोसेसिंग युनिट मधील हीटिंग डिस्टर्ब होते त्यामुळे विज बिल जास्त येते.
4. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कंपनीचा चांगला कच्चामाल खराब होतो त्यामुळे त्याला भंगार च्या भावात विकावे लागते.5. या प्रकारे होत असलेल्या नुकसानीमुळे आम्ही वेळेवर बँकांचे हप्ते व्याज ही भरू शकत नाही. तसेच बँकांचे व्याज जास्त लागते आणि उत्पादन कमी होते.
6. ही सर्व भरपाई आम्हाला मिळावी व त्याचबरोबर आमच्या जागेची व मशिनरींची किंमत लावून हे सर्व आपण विकत घेऊन भरपाई मिळावे. या नुकसानीच्या कचाट्यातून आम्हाला मोकळे करावे.









