अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील दहिवद गावातील स्वस्त धान्य दुकानांमधील शासकीय धान्य अपहारप्रकरणी मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल ९ लाख ६२ हजार १०८ रुपयांच्या गहू व तांदळाच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन रेशन दुकानदारांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी रुखसाना जमाल शेख (वय ४०, रा. भालेराव नगर, धुळे रोड, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दहिवद येथील रेशन दुकान क्रमांक १४५ चे परवानाधारक रमेश काशीनाथ पाटील तसेच दुकान क्रमांक १४६ च्या परवानाधारक श्रीमती कोकीळाबाई वासुदेव माळी यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तपासात आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिरिक्त शासकीय धान्य उचल करून शासनाची तसेच लाभार्थी कुटुंबांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाबाबत ग्रामस्थ श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१६(५), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.









