जळगाव (प्रतिनिधी):-जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयातील भू-संपादन प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महसूल व न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तथा विशेष भू-संपादन अधिकारी जयश्री चंद्रकांत माळी (वय ४९, रा. जळगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार किशोर बाबुराव पाटील (रा. ओमसाई प्लाझा, मोहीडी रोड, जळगाव) व शिवचरण माणिक ठाकरे (रा. पाचोरा तालुका) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, सन २०१५ मध्ये भू-संपादन कायदा १८९४ अंतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या संदर्भ अर्जांच्या प्रक्रियेत आरोपींनी बनावट लेटरहेड, बनावट शिक्के व अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर केला. आरोपींनी विशेष भू-संपादन अधिकारी कार्यालयाच्या नावाने खोटे दस्तऐवज तयार करून ते जिल्हा न्यायालयात दाखल केल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच भू-संपादन संदर्भ क्रमांक ७४ ते ८१/२०१७ तसेच ०५ ते १३/२०२५ या प्रकरणांमध्ये खोट्या नोंदी करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून शासनाची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१, २२७, २२८, ३१८(१), ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९ व ३४१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









