नातेवाईकांकडून घातपाताचा संशय, दुचाकीला मध्यरात्री अपघात
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अक्षय संजय देशमुख (वय २७, रा. कांचन नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून, गणेश पवार असे जखमी तरुणाचे नाव आहे.

त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय देशमुख आणि गणेश पवार हे दोघे धानोरा येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून आपल्या दुचाकीवरून जळगावच्या दिशेने परत येत होते. कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास हा अपघात घडला.
या घटनेनंतर मयत अक्षय देशमुख यांच्या नातेवाईकांनी हा निव्वळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. मयताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयच्या शरीरावर इतर गंभीर जखमा नसणे आणि दुचाकीचेही मोठे नुकसान झालेले नसणे या बाबी संशयास्पद वाटत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी नातेवाईकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.अक्षय देशमुख यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.









