अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
वडगाव नालबंदी शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले कृषी व महसूल विभाग; तातडीच्या आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

भडगाव
भडगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वडगाव नालबंदी शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे, माती वाहून जाणे, पिके आडवी पडणे तसेच उभी पिके पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत.
नुकसानाची माहिती मिळताच भडगावचे तहसीलदार शितल सोलाट व तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी सहाय्यक रेखा बनसोडे, महसूल सहाय्यक प्रसाद दुस्कर, कोतवाल विशाल सूर्यवंशी आणि ग्रामपंचायत शिपाई निलेश चव्हाण यांनी वडगाव नालबंदी शिवारात प्रत्यक्ष शेतांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
या वेळी शेतकरी पवन चित्ते, इंदल राठोड, भरत चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांची उपस्थिती त्या वेळी शेतात नव्हती, त्यांच्याशी कृषी सहाय्यक रेखा बनसोडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना तात्काळ शेतात बोलावून त्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण केले. त्यामुळे एकाही पात्र शेतकऱ्याचे नुकसान नोंदविण्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतल्याचे दिसून आले.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, मका व इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनीची धूप होऊन सुपीक माती वाहून गेली असून, शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने भविष्यातील शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंचनाम्यावेळी मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपल्या अडचणी मांडत, “मायबाप सरकारने शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पंचनाम्यानंतर तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. पीकनुकसान भरपाई, कर्जमाफी, तसेच पुढील हंगामासाठी बियाणे व खतांची मदत उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी केली.
प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. शासनाकडून लवकरात लवकर मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीने भडगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाच्या तातडीच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे









