कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील जैवभार कार्बन शोषण व साठवण क्षमतेच्या अभ्यासावर संशोधन; सावदा-मुंबई परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
सावदा (प्रतिनिधी) :- येथील बढे कुटुंबातील कन्या तसेच मुंबई येथे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. माधुरी राजेंद्र वाणी यांनी ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील जैवभार कार्बन शोषण व साठवण क्षमतेचा अभ्यास’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सावदा तसेच मुंबई परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

डॉ. माधुरी वाणी या मुंबईतील माटुंगा येथील खालसा महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागात शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. पर्यावरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल घेत त्यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. पुणे विद्यापीठाकडून त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांच्या पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेचे परीक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सोपान इंगळे यांनी केले.
डॉ. माधुरी वाणी या सावदा येथील प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुमनबाई निंबाजी बढे यांच्या कन्या असून, पी. टी. वाणी सर यांच्या सूनबाई आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना पर्यावरणविषयक संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी मिळविलेले हे यश सावदा परिसरासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.
पर्यावरण संवर्धन, जैवभारातील कार्बनचे शोषण व साठवण क्षमता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून डॉ. माधुरी राजेंद्र वाणी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








