शिवसेना जिल्हाप्रमुखांसह चौघा शेतकऱ्यांकडे चोरी
जळगाव (प्रतिनिधी):- शहरालगत असलेल्या शिरसोली प्र.बो. शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री चार शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींवरील तांब्याच्या वायर्स लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली येथील रहिवासी लक्ष्मण देविदास बारी (वय ४८) यांचे शिरसोली प्र.बो. शिवारात गट क्रमांक ३३१ मध्ये शेत आहे. दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर असलेल्या सोलर पंपाची तांब्याची वायर चोरून नेली. केवळ लक्ष्मण बारीच नव्हे, तर त्यांच्या शेजारील इतर तीन शेतकऱ्यांच्या विहिरींवरील वायर्सवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू रामदास भंगाळे, शरद विठ्ठल बारी आणि श्रीकृष्ण तुकाराम बारी या शेतकऱ्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी एकूण १०,१०० रुपये किमतीच्या तांब्याच्या वायर्स चोरल्या आहेत.
याप्रकरणी लक्ष्मण देविदास बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पाटील करीत आहेत. ऐन शेतीच्या हंगामात वायर चोरीच्या घटना वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.









