भडगाव तालुक्यात गिरणा नदीतील घटना
भडगाव (प्रतिनिधी):- दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या दोन वीर तरुणांच्या बलिदानाने संपूर्ण भडगाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या दोन लहान मुलांना वाचवण्यासाठी नदीम खान नसीम खान (वय २७) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय १६) यांनी धाडसाने नदीत उडी घेतली, मात्र दुर्दैवाने या दोघांचाही बुडून मृत्यू झाला.


रविवार, ८ मार्च रोजी गिरणा नदीपात्रात काही लहान मुले वाहून जात होती. जवळच कपडे धुवत असलेल्या काफियाने मुलांना वाचवण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्वतः बुडू लागली. ही माहिती मिळताच नदीम खान यानेही जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने या दोन्ही तरुणांना आपले प्राण गमवावे लागले.
प्रशासकीय धावपळ आणि शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा, महसूल विभागाचे तलाठी अविनाश जंजाडे, प्रशांत कुंभारे, राजू अहिरे, इक्बाल शेख आणि नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून विशेष पथक पाचारण केले होते. आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
अवैध वाळू उपसा ठरला काळ !
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात धोकादायक खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे आज दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.









