पंचायत राज विशेष कार्यक्रमात योजनांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी) – गाव पातळीवर ग्रामसेवक आणि सरपंच व पदाधिकारी यांनी चांगले काम केल्यामुळे जळगाव जिल्ह्याने घरकुल मंजुरी आणि बांधकामे पूर्णत्वाच्या कामात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. गावाने गाव पातळीवर गावाच्या विकासाची भूमिका घेणे हा खऱ्या अर्थाने पंचायत राज व्यवस्थेचा उद्देश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुरु असलेल्या घरकुल बांधकामाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असून हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आपण सर्वांनी येत्या काळात काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस लोखंडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार , भाऊसाहेब अकलाडे , मुख्य लेख व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश भोगावडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी, समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, कृषी विकास अधिकारी पदमनाभ म्हस्के , यांचेसह सर्व विभागांचे विभागप्रमुख व गटविकास अधिकारी या वेळी उपस्थित होते.
या वेळी जिल्ह्यात हागणदारी मुक्ती, सुंदर गाव योजना, घरकुल योजना यासह शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक तसेच पदाधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना करनवाल म्हणाल्या कि , पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश हा गाव पातळीवर ग्रामस्थानी गावाच्या विकासाचा स्वत विचार करणे हा आहे. त्या दृष्टीने बरेच गावे गावाच्या विकासात सहभागी होत आहेत. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामस्थानी गावाच्या विकासात योगदान देणे महत्वाचे आहे. त्या साठी ग्रामस्थानी व ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी यांनी एकत्र येणे व पुढाकार घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामसेवक तेथील सरपंच व पदाधिकारी यांनी अत्यंत चांगले काम केल्यामुळे जळगाव जिल्ह्याने घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत मोठे काम केले आहे. तरी देखील सध्या बांधकाम सुरु असलेलं घरकुले कोणत्याही स्थितीत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. घरकुलाच्या कामांची स्थिती दर्शविण्यासाठी लवकरच जळगाव जिल्हा परिषद स्वतंत्र ऍप विकसित करीत आहे. या ऍप मुळे घरकुल बांधकामाची नेमकी परिस्थिती कळू शकणार आहे. त्या सोबतच हप्ते वितरित करणे सोपे होणार आहे. त्यामुळे सर्व गावांनी बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण कशी करता येतील या बाबतची दक्षता घेण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले.