जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मयूर हॉटेलसमोर अंडापाव विक्रेत्याला पैसे मागण्याच्या कारणावरून तीन जणांनी शिवीगाळ करून दारूची बाटली डोक्यावर फोडून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ईश्वर संतोष साळुंखे (वय – ४६, रा. दिनकर नगर, आसोदा रोड, जळगाव) हे आपल्या परिवारासह राहायला आहे. जळगाव शहरातील मयूर हॉटेलसमोर त्यांचे अंडा पाव विक्रीची गाडी आहे. सोमवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पंकज व जितू (पूर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे तीन जण त्यांच्याकडे येऊन पैशांची मागणी केली. पैसे मागितल्यानंतर ईश्वर साळुंखे यांनी पैसे देण्यास नकार दिला, याचा राग आल्याने तिघांपैकी एकाने हातातील काचेची दारूची बाटली ईश्वर साळुंखे यांच्या डोक्यात टाकली, त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, या प्रकारानंतर मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता ईश्वर साळुंखे यांनी दिलेल्या जबाबावरून तीन जणांविरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीसहेड कॉन्स्टेबल निलेश भावसार करीत आहे.

