बालक बचावला, यावल तालुक्यातील थोरपाणी पाड्यावरील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी वस्तीवर रविवारी दि. २६ मे रोजी रात्री झालेल्या भयंकर दुर्घटनेत एकाच गरीब आदिवासी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मात्र परिवारातील आठ वर्षाचा बालक सुदैवाने बचावलाआहे.
संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी दि. २६ मे रोजी संध्याकाळ नंतर जोरदार वादळी वारा सुरू झाला. या वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केले होते. अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी छत कोसळून अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. यावल तालुक्याला वादळी वार्याचा फटका बसला. यात अनेक गावांमधील शिवारांमध्ये असलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेतकर्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी बहुल वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्याखाली अडकले. त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्या. यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ), त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही दोन वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. ढिगार्याखालून याच कुटुंंबातील शांतीलाल नानसिंग पावरा ( वय वर्षे ८) हा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले.
त्याने बचावासाठी आरोळ्या मारून परिसरातील लोकांना बोलावल्यावर या दुर्घटनेची माहिती मिळाली. थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझरकर आणि पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपल्या सहकार्यांसह थोरपाणी या पाड्यावर धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह ढिगार्याखालून काढून शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मयत नानसिंग पावरा यांचे नातेवाईक दाखल झाले आहेत.