मुक्ताईनगरसह विविध तीर्थक्षेत्रांचा होणार विकास
पुणे (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. राज्य शासनाने वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पारंपरिक पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या वृद्धपकाळात पेन्शन मिळणार आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या योजनांमध्ये वारकऱ्यांना सुरक्षा, अन्न, वैद्यकीय मदत, विमा कवच, आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. कीर्तनकारांना आरोग्य विमा आणि मानधन सन्मान योजना देण्यात येणार आहे. महामंडळाच्या मुख्यालयाची स्थापना पंढरपूर येथे केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गावागावांतून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक वारकऱ्यांची वारी पंढरपूरला येते. यात कामकरी, कष्टकरी, आणि शेतकरी यांचा प्रामुख्याने समावेश असतो. वाढत्या दिंड्यांच्या संख्येमुळे वारीचे व्यवस्थापन अधिक महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे ११ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महामंडळाच्या योजनांची वैशिष्ट्ये
१) आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना विमा संरक्षण आणि सुरक्षा पुरवली जाणार आहे.
२) कीर्तनकारांना आरोग्य विमा आणि त्यांच्या कार्यासाठी मानधन सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे.
३) सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद केली जाणार आहे.
४) वारकरी भजनी मंडळांना भजन आणि कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान देण्यात येणार आहे.
५) पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) आणि इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे.
६) चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी आणि इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाणार आहे.