धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा


ट्रॅक्टर-ट्रॉलीसह चोरीची वाळू जप्त
धरणगाव : प्रतिनिधी — धरणगाव शहरातील अहमदराजा चौक परिसरात बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमृत पंडित पारधी (वय ४६, रा. पारधी वाडा, धरणगाव) आणि सागर गणेश महाजन (वय २०, रा. संजय नगर, धरणगाव) हे दोघे वाळूची अवैधपणे उत्खनन करून चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.
संशयितांकडून सुमारे १० हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. ही वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून वाहतूक केली जात असताना पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत स्वराज कंपनीचा ७३५ एफई मॉडेलचा ट्रॅक्टर (क्रमांक MH 19 L 4675) तसेच इंजिन क्रमांक 43.1002/A0000186 असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली. ट्रॅक्टर व ट्रॉलीची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असून, वाळूसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख १० हजार रुपये आहे.
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच खान आणि खनिज अधिनियमातील कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अहमदराजा चौकातील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक ब. नं. १७४४ शरीफ नसीरखाँ तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ/३३८ महेंद्र बागुल करीत आहेत.
वाळू चोरी व अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.









