मुंबई ( प्रतिनिधी )- एसटी कर्मचाऱ्यांची उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. नंतर कठोर निर्णय घेऊ, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज दिला. आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली. नंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली. मात्र, त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या हाती घेत, विलीनीकरणापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. अनेक एसटी कर्मचारीही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाचे पुढे काय होणार, असा प्रश्न आहे.
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. खरे तर मागन्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आता कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा इशारा परबांनी दिला. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर जोडता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
परिवहन मंत्री परब म्हणाले की, अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या समितीसमोर मांडव्यात. आम्ही उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, ते मान्य करणार आहोत. त्यामुळे यापुढे संप करून जनतेला वेठीला धरू नका, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलकाचे नेतृत्व सध्या अॅड. गुणरत्न सदावर्ते करत आहेत. त्याबद्दल ते म्हणाले की, माझा संबंध कर्मचाऱ्यांशी आहे. त्यांची लिडरशीप कुणी करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.