नवी दिल्ली : -देशात करोनाबाधितांची संख्या रोज नवीन विक्रम करताना दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना आपला विळखा घट्ट करताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीबरोबर मृत्यूचा आकडा वाढत असून, ताज्या आकडेवारीमध्ये त्यात अधिक भर पडली आहे.

गेल्या २४ तासांत करोना रुग्णवाढ कमी झाली असली, तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात दीड हजारांहून अधिक करोनाबळीची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरात आढळून आलेल्या बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५९ हजार १७० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर दुसरीकडे १ लाख ५४ हजार ७६१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत असले, तरी काळजीची बाब म्हणजे देशात दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ हजार ७६१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून प्रचंड वेगाने वाढ होत असल्याने दुप्पट रुग्णवाढीचा कालावधीही झपाट्याने कमी झाला आहे. देशात रविवारी २ लाख ७३ हजार ८१० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यात सोमवारी घट झाली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रविवारी १,६१९ जणांचा मृत्यू झाला होता. १ हजार ७६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकाच दिवसात मृत्यूचा आकडा शंभरपेक्षा अधिक वाढला आहे.







