जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या काव्यरत्नावली चौक परिसरात रविवारी संध्याकाळी एक सुखद धक्का देणारे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कोणताही बडेजाव किंवा शासकीय प्रोटोकॉल न ठेवता थेट ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जाऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. पोलीस प्रमुखांच्या या साध्या आणि थेट संवादामुळे उपस्थित जळगावकर भारावून गेले होते.


सायंकाळच्या वेळी काव्यरत्नावली चौकातील कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांची मोठी गर्दी असते. याच ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अचानक भेट दिली. कोणत्याही औपचारिकतेत न अडकता ते थेट नागरिकांच्या घोळक्यात बसले. यावेळी त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था, रात्रीची गस्त, महिलांची सुरक्षितता आणि वाढत्या वाहतूक समस्यांबाबत नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेतले. संवादादरम्यान नागरिकांनी शहरातील वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक, तरुणांकडून होणारे ध्वनीप्रदूषण आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गैरप्रकारांकडे अधीक्षकांचे लक्ष वेधले.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली. “पोलीस आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते असणे ही काळाची गरज आहे. पोलिसांच्या कामात जोपर्यंत नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत प्रभावी पोलिसिंग शक्य नाही,” असे मत श्रीकांत धिवरे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, पोलिसांशी संबंधित कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास कोणत्याही संकोचाशिवाय थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्याच्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याने अशा प्रकारे कट्ट्यावर बसून समस्या ऐकून घेतल्यामुळे जळगावकरांनी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे.








