रावेर शहर हादरले, दोघांना अटक
रावेर (प्रतिनिधी) : शहरात धक्कादायक घटना घडली आहे. एका तीन वर्षीय मुलीचा तिच्या सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची घटना रावेर शहरात घडली असून मुलीच्या आईने गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह मुक्ताईनगर तालुक्यात नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मुलीच्या खून प्रकरणी मुलीची सख्खी आई व सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे. खूनामागील कारण समोर आलेले नाही. सदर घटना हि मुलीच्या सख्ख्या बापामुळे उघड झाली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला भारतपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलसवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी दुसरे लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. दि. ३१ मे रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली.
ही घटना अजयची पत्नी तथा मुलीची आई माधुरीस माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पती-पत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मात्र यावेळी माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खा बाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर “दुसऱ्या पप्पाने मारले” असे सांगितले. म्हसाने याला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
तेथे तपासणी केली असता मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलीचे शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने रावेर पोलिसांनी मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. भारत साहेबराव म्हसाने (वय ४०, रा. वारोली ता. जि. बऱ्हाणपूर, म. प्र.) यांनी फिर्याद दिली आहे.
अजय शांताराम घेटे (वय २९, रा. डॉ. आंबेडकर नगर, रावेर) व माधुरी भारत म्हसाने उर्फ माधुरी अजय घेटे (वय २५) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान खूनाचे कारण समजू शकले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ तपास करीत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.