धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : – शेतामध्ये असलेल्या गायीला चारा टाकत असतांना अचानक सापाने दंश केल्याने ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रल्हाद कौतिक पाटील (वय ७०, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे . प्रल्हाद पाटील हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शेतात गायीला चारा टाकत होते. त्या वेळी त्यांना तेथे सापाने दंश केला. हा प्रकार त्यांनी लगेच शेतातच असलेल्या आपल्या मुलांना सांगितल्याने . त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र संपूर्ण शरीरात विष पसरल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.